सांस्कृतिक / रंगभूमी---------------------------------------
पुन्हा एकदा मनोरंजनाची अनुभूती
" शांतेचं कार्ट चालू आहे "
(विजय न्यायाधीश याजकडून)
भारतीय रंगभूमीचा इतिहास लक्षात घेता मराठी नाटकांची मोठी परंपरा आढळून येते. विविध विषयांवरील अनेक उत्तमोत्तम नाटकांनी मायबाप प्रेक्षकांची कधी मनोरंजन तर कधी प्रबोधनाच्या माध्यमातून अभिरुची संपन्न करण्याचे काम केले आहे. नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञान, सादरीकरण अशा सर्वच बाबतीत मराठी नाट्य क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असल्याचे निदर्शनास येते. काही नाट्यकृती तर वर्षोनुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात घट्ट रुतून बसलेल्या आहेत. त्यातल्या त्यात विनोदी नाटकांकडे प्रेक्षकांचा कल अधिक प्रमाणात झुकलेला दिसून येतो. " शांतेचं कार्ट चालू आहे " हे त्यातीलच एक नाटक.
श्रीनिवास भणगे यांच्या खुशखुशीत लेखणीतून उतरलेल्या या नाटकाचा एकेकाळी रंगभूमीवर चांगलाच गाजावाजा होता. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवरील एक सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून लोकप्रियता मिळवली होती. मध्यंतरी या नाटकाने रंगभूमीवरुन एक्झिट घेतली होती. नुतन वर्षात पुन्हा एकदा हे सदाबहार नाटक नव्या दमाने प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले आहे. एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुपच्या बॅनरखाली अमेय खोपकर, स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे, आणि निनाद बत्तीन यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात विशाखा सुभेदार आणि प्रियदर्शन जाधव हे दोन विनोदाचे हुकुमी एक्के असून विक्रांत कोळपे, राजेश चिटणीस, मयुरा रानडे, प्रदिप जोशी आणि सुकन्या काळण हे कलावंत विविध भूमिका साकारत आहेत. कौटुंबिक बाजाचं हे नाटक छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांना हसवत ठेवत आणि घडीभर करमणूक करण्यात कसलीही कसर सोडत नाही.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारख्या या नाट्यकृतीबद्दल दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, हे नाटक नव्याने सादर करताना वर्तमान काळातील झलक आणि अधिक परिपक्वता त्यात कशी येईल याकडे लक्ष दिले आहे. प्रेक्षकांना हसवण्यासोबतच त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल याची आम्हाला खात्री आहे.
निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणतात, या नाटकाने एक काळ गाजवलेला आहे . नव्या पिढीसाठी आणि जुन्या रसिकांसाठी आम्ही हे नाटक नव्या उर्जेसह सादर करत आहोत. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या नाट्यकृतीचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा आहे.''
एकुण काय तर या नाटकाद्वारे यंदा सुट्टीच्या हंगामात एक दर्जेदार मनोरंजनाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार यात शंका नाही.