नवजात बाळाची 6 लाखांना विक्री, 5 जणांना अटक; मुलं चोरणारी गँग ठाणे जिल्ह्यातून हाती लागण्याची शक्यता
xtreme2day
26-12-2025 18:40:16
5732781
नवजात बाळाची 6 लाखांना विक्री, 5 जणांना अटक; मुलं चोरणारी गँग ठाणे जिल्ह्यातून हाती लागण्याची शक्यता
नवी मुंबई (क्राईम रिपोर्टर) - ठाणे जिल्ह्यात मानवी तस्करीचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे पोलिसांनी 7 दिवसांच्या नवजात बालकाची 6 लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.
ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी रात्री बदलापूर पश्चिम परिसरातील एका हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाद्वारे या टोळीशी संपर्क साधला आणि व्यवहाराची खात्री केली. या टोळीने बाळासाठी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 20 हजार रुपये टोकन म्हणून यूपीआय (UPI) द्वारे स्वीकारले, तर उर्वरित 5 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात घेण्याचे ठरले होते.
अटक केलेल्यांमध्ये शंकर मनोहर (वय 36), रेश्मा शेख (वय 35), नितीन मनोहर (वय 33), शेखर जाधव (वय 35) आणि आसिफ खान (वय 27) यांचा समावेश आहे. या बाळाची आई कोण आहे आणि हे बाळ कोठून आणले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अपत्यहीन जोडप्यांना अशा प्रकारे बाळ विकण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात काही रुग्णालये किंवा नर्सिंग होम्सचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
या टोळीने बाळाची विक्री करण्यासाठी एका हॉटेलबाहेर व्यवहार ठरवला होता. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे आरोपी अलगद अडकले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इगतपुरी आणि मुंबईतील एजंट्सचा समावेश आहे. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे बालकांची विक्री केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. बदलापूर (पश्चिम) पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्हाला संशय आहे की हे एक मोठे रॅकेट असून, यामध्ये बालकांचे अपहरण करून त्यांची विक्री केली जाते. या बाळाला सध्या सरकारी निगा केंद्रात ठेवण्यात आले आहे." फरार असलेल्या सबिना नावाच्या महिलेच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवी मुंबई परिसरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांंचे सत्र सुरु आहे. भिवंडीमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांतून चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शांतीनगर, कोनगाव आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. पहिल्या घटनेत ४ डिसेंबर रोजी पाणीपुरी खाण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षांची मुलगी अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत, २० डिसेंबर रोजी सकाळी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगीही बेपत्ता झाली असून, शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व प्रकरणांत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली असली तरी, वाढत्या घटनांमुळे शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.