सह्याद्रीच्या कुशीत वसणार नवीन महाबळेश्वर ; अत्याधुनिक पर्यटन स्थळ रोपवे, रेल्वे अशा सुविधा होणार
xtreme2day
03-02-2025 20:36:18
19756900
सह्याद्रीच्या कुशीत वसणार नवीन महाबळेश्वर ; अत्याधुनिक पर्यटन स्थळ रोपवे, रेल्वे अशा सुविधा होणार

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यात आणखी एक पर्यटनस्थळाचा उदय होणार आहे. नवीन महाबळेश्वरची रचना केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नंबर एकचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आणखी 294 गावांचा समावेश या प्रकल्पासाठी केला जाणार आहे. MMRDA कडून या नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे स्थळ आहे. सर्वाधीक थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरमध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी होती. मात्र आता आणखी महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटनस्थळाची रचना करण्यात येणार आहे. याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या तीन वर्षात आराखडा पूर्ण केला जाणार आहे. महाबळेश्वर पाचगणी भागात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.याचाच विचार करून राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्प करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली होती. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा,पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील 235 गावांचा यात समावेश करण्यात आला होता.आता आणखीन नव्याने 294 गावांचा या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात आपला समावेश करावा असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.
त्यामुळे आता या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात 529 गावांचा समावेश असणार आहे आणि 2097 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे गिरीस्थान उभारले जाणार आहे.या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नव्या अधिसूचनेनुसार कोयना बॅकवॉटर आणि परिसरातील गावांचा विकास करून नवीन महाबळेश्वर वसवले जाणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच लक्ष घातले आहे. या भागातील अधिकाऱ्यांचा बैठका देखील त्यांनी घेतल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील 235 गावांतील 1153 चौ किमी क्षेत्रफळावर हे नवीन पर्यटनस्थळ वसवण्यात येणार आहे.या गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्रॅक, फ्युनिक्युलर रेल्वे यासह टुरिजम पॅराडाईजसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळं पर्यटनाला चालना मिळणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. महाबळेश्वरच्या शेजारीच असलेल्या कोयना बॅकवॉटर भागात हे नवीन गिरीस्थान वसवण्यात येणार आहेत.
नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यातील 101 गावे, 193 पाटण आणि 49 जावळीची गावे आहेत. तसंच, या गावांचे एकूण क्षेत्र 1,15,300 हेक्टर इतके आहे हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने तो परिपूर्ण आहे. नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल.याबाबत या भागातील लोकांसोबत त्याच बरोबर पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका देखील घेण्यात आल्या होत्या. या प्रस्तावित प्रकल्पात पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता निसर्ग पूरक शाश्वत पर्यटन केलं जावं अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांनी केली जाते आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.