विकासदराचं पंतप्रधानांकडून कौतुक; स्वदेशीचा नारा, विदेशी पर्यटन टाळा, सोनं खरेदीही टाळा- मोदींचं आवाहन
Xtreme Today
01-09-2026 18:54:22
687531565
विकासदराचं पंतप्रधानांकडून कौतुक; स्वदेशीचा नारा, विदेशी पर्यटन टाळा, सोनं खरेदीही टाळा- मोदींचं आवाहन
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या 7.8% विकास दराचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आणि आत्मनिर्भरतेसाठी नागरिकांना ‘स्वदेशी’ व ‘स्थानिकांना प्रोत्साहन’ देण्याचे, परदेशातील लग्नसोहळे टाळण्याचे आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक सोन्याची खरेदी कमी करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले.
आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतीत भारताच्या जीडीपी आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये पश्चिम आशियातील तणावाच्या काळातील भारताचा विकासदर 7.8 टक्के राहिला असून पंतप्रधान मोदींनी 140 कोटी जनतेसमोर सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या जुन्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले आवाहन देशाची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेशी जोडले असून देशांतर्गत खर्च वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. भारताला परकीय चलन खर्च करणाऱ्या वस्तूंवरील खर्च कमी करण्याचे पंतप्रधांनी पुन्हा आवाहन केले. तसेच पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी जनतेला वर्षभर सोने खरेदी करणे टाळण्याचे आणि परदेशात डेस्टिनेशन वेडिंग आयोजित करण्याऐवजी देशांतर्गतच विवाहसोहळे पार पाडण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भारताच्या 7.8% विकास दराचे कौतुक केले, नागरिकांचे अभिनंदन केले आणि श्रेय देशाच्या सामूहिक शक्ती व कठोर परिश्रमाला या कामगिरीचे दिले. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड-19 नंतर जागतिक संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि आर्थिक अनिश्चितता असूनही भारताची वाढ सुरूच राहिली आहे.
मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधांनी म्हटले की अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकांनी खर्चाकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांनी लोकांना अनावश्यक परदेशी खर्च कमी करून देशांतर्गतच पैसे खर्च करण्याचे आवाहन केले. जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदार देशांपैकी भारत सोन्याच्या मागणीचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे, भारतीय मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात, तेव्हा त्यांना पैसे परदेशात पाठवावे लागतात आणि यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव येऊ शकतो. याच संदर्भात पंतप्रधान मोदींनी लोकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले असून सध्याच्या अनिश्चित जागतिक परिस्थितीत भारताने परकीय चलन वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
पंतप्रधानांनी पुन्हा जनतेला परदेशात डेस्टिनेशन वेडिंग न करण्याचे आवाहनही केले. लग्नसोहळे भारतातच झाले, तर त्याचा देशातील हॉटेल्स, पर्यटन, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि इतर स्थानिक व्यवसायांना फायदा होईल, असे मोदींनी व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले. त्याचवेळी, लग्नाशी संबंधित खर्चाचा मोठा भाग देशाबाहेर वळवला जात असून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा उद्देश असा खर्च भारतातच ठेवणे आणि देशांतर्गत व्यवसायाला चालना देण्याचा आहे.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागे परकीय चलनाची बचत मुख्य आर्थिक कारण आहे. कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्यांपैकी भारत सोन्याचीही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यामुळे, तेल आणि सोन्यासारख्या आयातीवरील खर्चामुळे देशाचे डॉलरमधील व्यवहार वाढते.
याआधी पंतप्रधानांनी मे 2026 मध्ये जनतेला सोन्याची खरेदी आणि अनावश्यक परदेश प्रवास कमी करण्याचे आवाहन केलेले तर, आता पुन्हा सद्यस्थितीत परकीय चलन वाचवण्याच्या महत्त्वावर भर दिला. पंतप्रधानांचे आवाहन केवळ बचतीपुरते मर्यादित नाही, तर यामागील आणखी एक पैलू म्हणजे स्वदेशी आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा आहे. भारतीयांनी आपला खर्च भारतांतर्गतच केला पाहिजे जेणेकरून देशातील व्यवसाय, रोजगार आणि सेवांना फायदा होईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजच्या आवाहनात मोदींनी हाच विचार पुढे नेला आणि केवळ कमी खर्च करण्याचाच नव्हे, तर शक्य तिथे देशांतर्गतच खर्च करण्याचा संदेश दिला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.