नेपाळनंतर आता भारतात महापुराचं संकट; चित्रकूटमध्ये अनेक गावांना पाण्याचा वेढा, मंदाकिनी नदीची पातळी वाढली
Xtreme Today
29-08-2026 19:19:50
97641492
नेपाळनंतर आता भारतात महापुराचं संकट; चित्रकूटमध्ये अनेक गावांना पाण्याचा वेढा, मंदाकिनी नदीची पातळी वाढली
चित्रकूट उत्तर प्रदेश (प्रतिनिधी)- नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार उडालेला असतानाच आता उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये मोठं संकट आलं आहे. मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेपाळच्या मार्गाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आलेलं पाणी नदी काठच्या लोकांच्या घरात शिरलं आहे. रस्ते देखील बंद झाले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत आहे. नदीच्या काठी असलेले आश्रम, मंदिर, मठ, रामघाट आणि दुकानं तसेच हॉटेल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे लोकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.
गेल्या 90 वर्षानंतर प्रथमच मंदाकिनीला महापूर आला आहे. मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील जो भाग या नदीच्या काठावर आहे, त्याला प्रचंड फटका बसला आहे. लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला आहे. पाण्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या छतावर आश्रय घेतला आहे. नदी काठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला असून, चारही बाजूने पाणीच पाणी दिसून येत आहे. दरम्यान आता या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. मंदाकिनी नदीच्या पाणीपातळीत एवढी प्रचंड वाढ झाली आहे की, रामघाट येथील मोठा पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीच्या काठी असलेले अनेक धार्मिक स्थळं देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.
जानकीकुंड, पंजाबी भगवान आश्रम, आरोग्यधाम, सद्गुरू सेवा संघ, आश्रम, जगद्गुरू रामभद्राचार्य आश्रम या प्रमुख आश्रमासह या परिसरात असलेल्या शेकडो आश्रमांमध्ये पाणी शिरलं आहे. परिस्थिती चिंताजनक बनली आहे. लोकं घरात अडकून पडले आहेत. दरम्यान आता स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. परिस्थिती चितांजनक बनली आहे, पुराचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील गंडक नदीत तीन मृतदेह वाहून आले आहेत. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही मृतदेह नेपाळमधून वाहत आले आहेत. अधिकाऱ्यांनीही त्याची पुष्टी केली आहे. हे तिन्ही मृतदेह बॅराज पियर 3 येथे मिळाले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. कुशीनगरच्या खड्डा एरियात हे मृतदेह आढळले. खड्डा विभागाचे एसएचओ संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉनिटरिंग टीमला हे मृतदेह वाहत असल्याचं दिसलं. त्यामुळे तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्याची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.