Xtreme Today 26-08-2026 18:52:17 173528772
नेपाळमध्ये महाप्रलयामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत; पाच जिल्ह्याना मोठ्या पुराचा तडाखा काठमांडू (विशेष प्रतिनिधी) - नेपाळमध्ये महाप्रलयामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तिबेटमध्ये सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे हिमस्खलन झाले आणि त्यानंतर नेपाळमध्ये पुराचा प्रचंड लोट आला. काही तज्ञांच्या मते, तिबेटमधील ग्लेशियर लेक फुटल्यामुळे हा प्रलय आला असावा. या महापुरात एक हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले असून, यात १०० पेक्षा जास्त भारतीय पर्यटक, एकूण साडेतीनशेहून अधिक पर्यटक बेपत्ता झाले आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन विभागाने दिली आहे. नदीकिनारी असलेली घरे, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेले आहेत. काही सेंकंदांच्या हादऱ्यांमुळे इतकं मोठं संकट ओढावलं आहे असे सरकारने संसदेमध्ये सांगितलं. रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पुराचे पाणी त्रिशुली नदीत मिसळून धुवाकोट, धादिंग आणि इतर जिल्ह्यांमध्येही पसरले आहे. पाण्याचा लोट इतका प्रचंड आणि वेगवान होता की, लोकांना पळायलाही वेळ मिळाला नाही. हेलिपॅड पाण्याखाली गेल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत आणि वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. नेपाळ सध्या या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. भारतामध्ये बिहारलाही या पुराचा धोका असल्यामुळे बिहार सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे.