Xtreme Today 27-07-2026 20:02:06 24473859
सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि डीपफेक सामग्रीमध्ये ई-20 इथेनॉलमधून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर ई-20 पॉलिसीच्या माध्यमातून कुटुंबीयांचा फायदा केल्याच्या आरोपावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मेटा आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची गडकरींना दिली आहे. नीट पेपरफुटीनंतर देशात तरुणांचे प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या नितीन गडकरी यांनी लेटर्स पेटंटच्या कलम १२ अंतर्गत हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि डीपफेक सामग्रीमध्ये ई-20 इथेनॉल कार्यक्रमातून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. ई-20 पॉलिसीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ई-20 इथेनॉल कार्यक्रमातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना आर्थिक फायदा झाल्याचा दावा करणाऱ्या बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट आणि डीपफेक व्हिडिओंविरोधात गडकरी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने मेटा आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी त्यांना दिली आहे. दरम्यान, एकीकडे नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉल धोरणावरून गंभीर आरोप होत असताना त्यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबल्याचं दिसत असून त्यांच्याकडून आगामी काळात आरोप करणाऱ्यांविरोधात दिवाणी दावा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला होता. "जात, धर्म, पक्ष विसरून आपण देशभक्त भारतीय म्हणून इथे जमला आहात. ही गर्दी विष्णूचा अवतार आहे. नरेंद्र मोदी यांनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत; त्यांना देशाचे काम करायला सांगा. अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत; पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा उर्फ रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात. पुढचा नंबर त्यांचाच आहे’ असं ते म्हणाले होते.