अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी – RSS सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
xtreme2day
03-07-2026 20:14:23
589054778
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी – RSS सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
नवी दिल्ली/अयोध्या (प्रतिनिधी) – अयोध्येतील राम मंदिरातील देणगीपेट्यांमधील कथित चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला मोठा धक्का बसला असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शुक्रवारी केली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत "हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्ती" हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा कटकारस्थानांना हाणून पाडण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने संयम आणि धैर्य राखावे, असे आवाहन त्यांनी केले.
'एक्स' (X) वरील आपल्या निवेदनात होसबळे म्हणाले, "अयोध्येतील श्री रामलला मंदिरातील देणगीपेट्यांमध्ये झालेल्या चोरीच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला खोलवर आघात झाला आहे. या घटनेमुळे आपण सर्व अत्यंत दुःखी आणि संतप्त आहोत." त्यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संपूर्ण हिंदू समाजाची अपेक्षा आहे की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या अत्यंत निंदनीय घटनेकडे अपवादात्मक गांभीर्याने पाहावे आणि मंदिराच्या व्यवस्थापनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. कोट्यवधी रामभक्तांची अयोध्येतील राम मंदिरावरील श्रद्धा आणि विश्वास अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
होसबळे यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, त्याच्या शिफारशींनुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासानंतर दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सध्या निर्माण झालेली संभ्रम आणि अनिश्चिततेची स्थिती लवकरात लवकर संपुष्टात आली पाहिजे. यासाठी मंदिर प्रशासन आणि सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेले भव्य मंदिर हे अनेक पिढ्यांच्या संघर्षातून तसेच कोट्यवधी रामभक्तांच्या समर्पण, त्याग आणि बलिदानामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र बनले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. योग्य आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शक आणि त्रुटीविरहित प्रशासन, तसेच पावित्र्य, शुचिता आणि खऱ्या धार्मिकतेचे वातावरण कायम ठेवून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाचा विश्वास अधिक दृढ करेल, असा विश्वासही होसबळे यांनी व्यक्त केला.
तसेच या कठीण प्रसंगी संपूर्ण हिंदू समाजाने संयम राखून हिंदू धर्म आणि समाजाची बदनामी करण्यासाठी या दुर्दैवी घटनेचा गैरवापर करणाऱ्या हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचे कटकारस्थान हाणून पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.