xtreme2day 07-05-2026 21:27:50 135780756
पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ संपताच, राज्यपालांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहित संपूर्ण मंत्रिमंडळ केलं विसर्जित! कोलकाता (विशेष प्रतिनिधी) - पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ संपताच राज्यपालांनी संपूर्ण मंत्रिमंडळ विसर्जित केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाला होता. या घटनात्मक पेचातून राज्यपालांनी मार्ग काढला आहे. आमचा नैतिक विजय झाला आहे. निवडणुकीत आमचा पराभव घडवून आणण्यात आला. जनतेनं आम्हाला नाकारलं नाही. निवडणूक आयोग आमच्यासाठी व्हिलन आहे. आमचा लढा भाजप विरोधात नव्हे, तर निवडणूक आयोगाविरोधात होता, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची भूमिका जाहीर केली होती. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असं म्हणत ममता बॅनर्जी इरेला पेटल्या होत्या. निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं घटनात्मक पेच निर्माण झाला. अखेर या पेच प्रसंगातून राज्यपाल आर. एन. रवी यांनी मार्ग काढला. त्यांनी घटनात्मक प्रक्रिया वापरुन संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणातील ममता बॅनर्जी यांच्या सत्ता पर्वाचा शेवट झाला. बॅनर्जी १५ वर्षे बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या. कोलकाता गॅझेटमध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. हा निर्णय ७ मे २०२६ पासून लागू झाला आहे. याचा अर्थ आता राज्यात ना कॅबिनेट शिल्लक आहे, ना ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी आहेत. राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांच्या अंतर्गत अधिसूचना जारी करत अभूतपूर्व संकटातून मार्ग काढला आहे. गॅझेट नोटिफिकेशननुसार, राज्यपालांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७४ (२) (बी) च्या अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर केला. या अधिसुचनेवर बंगालचे मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांची स्वाक्षरी आहे. विधानसभा बरखास्त झाल्यानं बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे.
uzupx4