जगाच्या कल्याणासाठी व विश्व शांतीसाठी हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे; राष्ट्राच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान देणे आवश्यक
xtreme2day
06-04-2026 20:59:36
4537845
जगाच्या कल्याणासाठी व विश्व शांतीसाठी हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे; राष्ट्राच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान देणे आवश्यक

पुणे (प्रतिनिधी) - इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य करून हिंदू समाज जातीपातीमध्ये विभागला परंतु आता भाषा,वेशभूषा वेगवेगळ्या असल्या तरी हिंदू म्हणून आम्ही एक आहोत हे अशा संमेलनाद्वारे दाखवून देत आहोत.जगाच्या कल्याणासाठी व विश्व शांतीसाठी हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे याचबरोबर राष्ट्राच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी सांगितले.

सकल हिंदू समाज द्वारा देशपातळीवर विविध ठिकाणी आयोजित हिंदू मेळाव्यांमुळे समाजामध्ये हिंदुत्वाचा भाव जागृत होत असल्याचे कर्वेनगर येथील मधुसंचय गणपती ट्रस्ट व अलंकार दत्त मंदिर समिती द्वारा आयोजित नव सह्याद्री वस्ती विराट हिंदू संमेलनामध्ये हिरेमठ बोलत होते.
राष्ट्रीय सेविका समितीच्या वैष्णवी सहस्त्रबुद्धे यांचे मातृशक्ती संबोधन झाले त्या भाषणात म्हणाल्या,"आपल्या हिंदू संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण झाले असून आपली हिंदू संस्कृती टिकवली पाहिजे त्यासाठी कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे.आपल्या परंपरा विसरता कामा नये.देशाला परम वैभवाकडे न्यायचे असेल तर पंचपरिवर्तन म्हणजे स्वबोध,सामाजिक समरसता,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संरक्षण,नागरी कर्तव्ये पालन द्वारे समाजामध्ये कार्यकरावे.भाषा,भूषा,भोजन,भ्रमण,भजन ह्या गोष्टी सर्वांनी एकत्रित आचरणात आणाव्यात व भारतीय संस्कृतीचे रक्षण करावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
युनायटेड वेस्टर्न सभागृहात संपन्न झालेल्या ह्या हिंदू संमेलन कार्यक्रमाच्या सुरवातीस अनिल खाडिलकर यांनी शंखध्वनी करून मंगलमय वातावरण निर्माण केले. सुरेशराव हिरेमठ,रजनी जोशी,महेश पानसे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांचे हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले.अश्विनी साने व त्यांच्या सहकाऱ्यांनी "जयोस्तुते" समूह गीत सादर केले.अनंत रुक्मिणी मधील बाल कलाकारांनी गणेश वंदना सादर केली.चैत्राली मानकर हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील पोवाडा सादर केला.प्रमुख पाहुण्यांचे महेश पानसे व रजनी जोशीराव यांनी स्वागत केले.अश्विनी साने व राष्ट्रीय सेविका समितीच्या सेविकांनी संपूर्ण वंदेमातरम म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.प्रशांत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.गोंदवले परिवारातील दिलीप साळुंखे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आले.याप्रसंगी सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेष अंकाचे पाहुण्यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
भव्य शोभायात्रेमध्ये ढोल ताशा सह नागरिक सहभागी
कर्वेनगर भगवेमय
हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमाच्या सुरवातीस कर्वेनगर,अलंकार, नवसह्याद्री,परिसरातील नागरिकांनी भव्य शोभायात्रा काढली रमांबिका मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा ताथवडे उद्यान मार्गे राजा मंत्री रस्त्यावरून संमेलन सभागृह येथे सांगता झाली.यात नागरिक,महिला मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.भगवे झेंडे,हिंदू संमेलन फलक घेऊन उत्साहात ढोल ताशा सह शोभा यात्रा निघाली होती.यामध्ये बाल,तरुण,जेष्ठ नागरिक,विविध सामाजिक संस्था,संघटनांचे पदाधिकारी,हिंदुत्वनिष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषेतील यांचा सहभाग हे ह्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते.यामुळे संपूर्ण परिसर हिंदुमय झाला होता.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.