xtreme2day 24-03-2026 18:41:45 3820646
छत्रपती संभाजीनगर शहराची पाण्याची प्रतीक्षा संपणार! १४ एप्रिलपर्यंत नव्या पाणीपुरवठा योजनेतून शहरात पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगर शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून पुढील ३० वर्षांचा पाणीप्रश्न सोडवणारी ही महत्त्वाकांक्षी योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सुमारे २७४० कोटी रुपयांची ही नवीन पाणीपुरवठा योजना आता पूर्ण होत आली आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कॅबिनेट मंत्री माननीय नामदार अतुल सावे साहेब यांच्या निर्देशांमुळे हे काम वेगाने पूर्ण होत असून आपल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे आणि लवकरच शहराला मुबलक पाणी मिळेल. जायकवाडी धरणातून शहराकडे पाणी आणण्याच्या कामाची यशस्वी चाचणी सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी सुमारे दीड किमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने शहरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. जायकवाडी धरणावर ३,७०० अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी यशस्वी झाली असून २५०० मिमी जलवाहिनीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे दीड किलोमीटरपर्यंत पाइपलाइनची चाचणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि ३८ किमी पाइपलाइन मधील स्वच्छता वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचेल आणि शहराला दररोज सुमारे २०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल.