xtreme2day 13-05-2025 17:30:43 37938953
भारत माता की जय फक्त घोषणा नाही ही त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारतमातेसाठी जिवाची बाजी लावतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारत माता की जय फक्त घोषणा नाही ही त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारतमातेसाठी जिवाची बाजी लावतो. 'भारत माता की जय' मैदानात ही घुमतो आणि मोहिमेतही घुमते. भारताचे सैनिक भारत माता की जय म्हणतात तेव्हा शत्रुंचे काळीज चिरते. जेव्हा आपले ड्रोन, मिसाईल लक्ष्यांवर केंद्रीत होतात तेव्हा शत्रुंना भारत माता की जय ऐकू येते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांचे कौतुक केले. आज पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या आदमपूर तळाला भेट दिली. यावेळी सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी त्यांनी अतिरेक्यांना आश्रय देणारे सरकार आणि अतिरेकी यांना वेगळे समजणार नाही, भारत आपल्या शर्थीवर शत्रूला उत्तर देणार, कुठलीही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही. अशी त्रिसुत्रीही सांगितली. तसेच "जेव्हा आपले सैन्य न्युक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवा काढतात तेव्हा आकाश ते पाताळ फक्त भारतमातेचाच जयघोष होतो. तुम्ही प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. तुम्ही नवा इतिहास रचला आहे. मी आज तुमचे दर्शन करायला आलो आहे. शूरविरांचे पाय जमिनीवर पडतात तेव्हा धरती धन्य होते. अशा विरांचे दर्शन मिळाले की आयुष्य धन्य होते. भारताच्या पराक्रमाची कायम चर्चा होईल त्यामधला सर्वात महत्वाचा अध्याय तुम्ही आणि तुमचे असतील. मी विरांच्या या धरतीवरुन एयरफोर्स, नेव्ही, सर्वांना सलाम करतो, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तसेच "जेव्हा आमच्या लेकींचे कुंकु पुसले गेले तेव्हा आम्हाला दहशतवाद्यांना चिरडून टाकावे लागले. तुम्ही दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले.9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना हे समजले आहे की भारताकडे डोळे वटारणाऱ्या प्रत्येकाचा एकच शेवट असेल, तो म्हणजे विनाश." असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला.