xtreme2day 10-05-2025 16:20:04 54379253
भारतावर अणुबॉम्ब वापरण्यासाठी पाकिस्तानी मनसुबा अमेरिकेने हाणून पाडला ! नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारताच्या हल्ल्यानं घाबरलेल्या पाकिस्ताननं अणूबॉम्बचा वापर करण्याबाबत बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला होता. पण, अमेरिकेनं हस्तक्षेप करताच पाकिस्ताननं ही बैठक रद्द केली. अमेरिकेनं दबाव टाकल्यानंच पाकिस्ताननं बैठक रद्द केल्याचं मानलं जात आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माघार घेतली आहे. भारतावर करण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले अयशस्वी झाल्यानं पाकिस्तान संतपाला आहे. त्यामधूनच पाकिस्ताननं नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती. पाकिस्तान सैन्य आणि सरकारची ही उच्च समिती आहे. ही समिती अणूबॉम्ब वापराचा निर्णय घेते. पाकिस्तान सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. अमेरिकेने यापूर्वीही दोन्ही देशांना शांतततेचं आवाहन केलं होतं. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. भारताचा एअर डिफेन्स अतिशय भक्कम आहे. त्यामुळे पाकिस्तानला तो भेदणे जमलेलं नाही. अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्याचं सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला. या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधणे तसेच थेट संवाद पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यातील वाद टाळण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने रचनात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव दिला.