Xtreme Today 29-08-2026 19:15:00 559071459
मनोज जरांगेंचा आरपारच्या लढाईचा एल्गार; आता माघार नाही असा पवित्रा! जालना (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले, तसेच आंदोलनापासून दूर राहणाऱ्या राजकीय नेत्यांना कडक शब्दांत इशारा दिला. मराठा बांधव अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांचा जीव आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा, या आमच्या मनातील भावना आहेत म्हणूनच आम्ही आंतरवालीकडे निघालो आहे, असं मराठा बांधव म्हणत आहेत. सरकारनं 58 लाख नोंदी दिल्या, पण आता जात पडताळणी होत नाही, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. आम्ही मराठा कार्यकर्ते नाहीत तर विद्यार्थी आहोत, फक्त आरक्षणामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य त्यासाठी आम्ही आंतरवालीकडे निघालो असल्याचंही मराठी बांधव सांगत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुग्रीव बापू शिंदे असे या आंदोलकाचे नाव असून ते केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सराटी आंतरवाली येथे आजपासून उपोषण सुरू केले असून त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी अंतरवालीकडे जात होते, गेवराई जवळ त्यांचे वाहन आले असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.