गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार प्रसाद मिळावा यासाठी प्रशासन सरसावले!
Xtreme Today
27-08-2026 19:26:08
376982197
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार प्रसाद मिळावा यासाठी प्रशासन सरसावले!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गणरायाच्या नैवेद्यासाठी आणि भाविकांच्या सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाई, खवा, तूप, सुकामेवा तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यंदा विशेष तपासणी मोहीम महिनाभर आधीच सुरू केली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घ्या. ताटात कोणते पदार्थ आहेत, याकडे अधिक डोळसपणे लक्ष द्या. मैद्याचे, तळलेले, अतिसाखर असणारे, तेलकट पदार्थ टाळा. केवळ गणेशोत्सवासाठी नाही तर वर्षभरातील सणांचे कॅलेंडर तयार केले आहे. त्यानुसार आता 'एफडीए'कडून तपासणी करण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षी ही तपासणी गणेशोत्सवाच्या अवघ्या आठ ते दहा दिवस आधी सुरू होत असल्याने प्रत्यक्ष कारवाईसाठी कमी वेळ मिळत होता. यंदा मात्र मोहिमेला लवकर सुरुवात केल्याने सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार प्रसाद मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मोदक, लाडू, पेढे, बर्फी, काजूकतली, रसगुल्ला, श्रीखंड, बेसन लाडू, बुंदी लाडू, रवा लाडू, नारळाची वडी आणि खव्याच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्यासाठी वापरले जाणारे दूध, खवा, तूप, खाद्यतेल, साखर, सुकामेवा तसेच, इतर कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी लवकर सुरू झाल्याने मिठाई उत्पादक आणि विक्रेते अधिक सतर्क झाले आहेत. मिठाई तयार केल्याची तारीख आणि ती वापरण्याची अंतिम तारीख ग्राहकांना स्पष्टपणे दिसेल, अशी माहिती देणे बंधनकारक आहे. हा नियम केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून वर्षभर पाळणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. विशेषतः खवा, तूप आणि खाद्यतेलामध्ये भेसळ आहे का, तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरलेले कच्चे पदार्थ निर्धारित दर्जाचे आहेत का, यावर भर दिला जाणार आहे. संशयास्पद किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील.
महाराष्ट्रातील पारंपारिक मोदक, लाडू, लाडू, पेढे आणि बर्फीसोबत गणेशोत्सवाच्या काळामध्ये गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रपदेश, तेलंगणा तसेच इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात मिठाया येतात. सोनपापडी, संदेश, घेवर, मोहनथाळ, धारवाड पेढा, म्हैसूरपाक यांसारख्या अन्य राज्यांतून येणाऱ्या मिठायांचे नमुनेही तपासणीच्या कक्षेत आणले जाणार आहेत. वाहतूक तसेच, साठवणुकीदरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे पाहावे लागणार आहे.
तसेच दुकानांमध्ये उघड्यावर विक्रीस ठेवलेल्या मिठाईची स्वच्छता, हाताळणी, साठवणूक आणि विक्रीची पद्धत यांचाही आढावा घेतला जाणार आहे. मिठाई तयार करण्याची जागा स्वच्छ आहे का, तयार पदार्थ योग्य पद्धतीने साठवले आहेत का आणि खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता आहे का, याची तपासणी पथके पाहणी करतील. मिठाई आकर्षक दिसण्यासाठी वापरले जाणारे खाद्य रंग आणि सजावटीचे पदार्थही तपासणीच्या कक्षेत असतील. परवानगी नसलेले रंग किंवा नियमबाह्य पद्धतीने वापरलेले घटक आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. केवळ मिठाईची गुणवत्ता नव्हे, तर पॅकबंद अन्नपदार्थांवरील लेबलिंग योग्य आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. पॅकबंद पदार्थांवर उत्पादनाचे नाव, घटकांची माहिती, वजन, उत्पादन व पॅकिंगची तारीख, मुदतबाह्य होण्याची तारीख आणि घटकांची माहिती देणे आवश्यक आहे. मिठाई किंवा खाद्यपदार्थांमध्ये दूध, सुकामेवा, शेंगदाणे, सोया आदींची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी पॅकबंद मिठाई खरेदी करताना केवळ आकर्षक पॅकिंग न पाहता लेबलवरील सर्व माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.