महाराष्ट्र सरकारकडून कृत्रिम (अॅनालॉग) पनीरच्या उत्पादन व विक्रीवर बंदी
Xtreme Today
05-08-2026 19:47:33
553791867
महाराष्ट्र सरकारकडून कृत्रिम (अॅनालॉग) पनीरच्या उत्पादन व विक्रीवर बंदी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने बुधवारी कृत्रिम अथवा अॅनालॉग पनीरच्या उत्पादन आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी जाहीर केली. वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि विविध रासायनिक मिश्रणांपासून तयार होणाऱ्या या दुग्धविरहित पनीरामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे कारण सरकारने दिले आहे.
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR)चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, "सार्वजनिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय असून त्यात कोणतीही तडजोड होता कामा नये. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अॅनालॉग पनीरवरील बंदीमुळे आमच्यासारख्या प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळेल. काही गैरप्रकार करणाऱ्या व्यावसायिकांमुळे आमच्यावर संशय घेण्याची किंवा कारवाई होण्याची भीती आता राहणार नाही."
अॅनालॉग पनीर हा पारंपरिक दुधापासून बनणाऱ्या पनीरचा दुग्धविरहित पर्याय असून तो दूधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर रासायनिक घटक वापरून तयार केला जातो. त्याचे उत्पादन पारंपरिक पनीरपेक्षा खूपच कमी खर्चात होते आणि त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही कमी असते.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रभर अॅनालॉग किंवा दुग्धविरहित पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, निर्मिती, पॅकिंग, साठवणूक, वितरण (वाहतुकीसह), घाऊक व किरकोळ विक्री तसेच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यास एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जन्मठेपेपर्यंतच्या कारावासाची आणि ₹१० लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी छत्तीसगड राज्यानेही अशाच प्रकारची बंदी लागू केली होती.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अॅनालॉग पनीरमध्ये हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य चरबी, ट्रान्स फॅट्स किंवा संतृप्त चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे हृदयविकार, उच्च कोलेस्टेरॉल आणि शरीरातील दीर्घकालीन दाह (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.