सीओईपी पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात तरुण क्लायमेट चॅम्पियन्सचा सन्मान
xtreme2day
29-09-2025 23:11:35
3538014
सीओईपी पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात तरुण क्लायमेट चॅम्पियन्सचा सन्मान
पुणे (विशेष प्रतिनिधी) – देशातील हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात गौरव करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम आणि सीईई यांच्या सहकार्याने “राज्यस्तरीय पाणी संवर्धन उत्कृष्ट पुरस्कार समारंभ” सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर येथे संपन्न झाला.
राज्यातील विविध महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय पाणी संवर्धन कार्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन हे व्यापक सामाजिक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेले आजचे युवक शास्त्रीय ज्ञान आणि ठोस कृतीतून हवामान बदलासारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत हे निश्चितच उत्साहवर्धक आहे.”
महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी २०२३ पासून “यूथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप (YEWS)” ही राज्यव्यापी मोहिम राबवली आहे. या अंतर्गत १३ जिल्ह्यांतील १,५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करून पाणी बचतीसाठी वैयक्तिक, संस्थात्मक व सामुदायिक पातळीवर उपक्रम राबवले गेले आहेत.
विद्यार्थ्यांनी गळणारे नळ दुरुस्त करणे, आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, दात घासताना पाणी न वाहू देणे असे उपाय दैनंदिन जीवनात अंगीकारले. संस्था स्तरावर पावसाचे पाणी साठवणे, सोक पिट्स व रिचार्ज पिट्स तयार करणे आदी उपक्रमही राबवले गेले.
ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ७,९१,००० विद्यार्थ्यांनी दैनंदिन सवयींमध्ये बदल करून एकत्रितपणे सुमारे २५.८ दशलक्ष घनमीटर पाणी वाचवले असून ही माहिती “Why Waste YEWS” या मोबाईल अॅपद्वारे नोंदवली गेली आहे. याशिवाय, MahaYouthNet पोर्टलवर राज्य सरकारने हवामान बदल व पाणी व्यवस्थापन विषयक ऑनलाइन सेल्फ-पेस्ड कोर्स सुरू केला आहे. आतापर्यंत २,२५,३७८ विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला असून १,३१,२९१ विद्यार्थ्यांनी तो यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मधील उपक्रमांच्या मूल्यमापनाच्या आधारे “सर्वोत्कृष्ट ग्रीन क्लब”, “पाणी संवर्धनावर सर्वोत्तम पोस्टर” आणि “पाणी बचतीवर सर्वोत्तम शॉर्ट व्हिडीओ/रील” या गटांमध्ये पाच राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यासाठी निवडलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स व विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पालघर, पुणे व सातारा जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस), युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन (सीईई), वाय वेस्ट आणि युवक नेटवर्क यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.