राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत ; येत्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा !
xtreme2day
15-09-2025 22:53:10
79450430
राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत ; येत्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा !
पुणे (विशेष प्रतिनिधी) - येत्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे, मराठवाडा आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यातील पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाही, 16 सप्टेंबरला देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस कोसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही भागांमध्ये कमी वेळात अधिक पाऊस होऊ शकतो.
मंगळवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अनेक गावांचा सर्पंक तुटला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.