मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिर
xtreme2day
18-08-2025 18:20:53
185650061
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अतिवृष्टी ; मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊसच पाऊस!
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटी! 800 गावांना फटका, 226 लोकांची सुटका, 4 गावातले लोक फसले, सैन्याला पाचारण


पुणे (विशेष प्रतिनिधी) - मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटी झाल्यामुळे 800 गावांना फटका, 4 गावातले लोक फसले, सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, भारतीय हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः रेड अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे. पण त्याचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटी झाली आहे. मुखेड आणि मुक्राबादचा परिसर यामुळे बाधित झाला आहे. या भागात तब्बल 206 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस म्हणजे ढगफुटी म्हटले जाते. यापावसाने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला अजून तब्बल 800 गावांना याचा फटका बसला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. इथं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. शिवाय सैन्याला ही मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यात पूर स्थिती आहे. पण सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या विक्रमाबाद भागाला बसला आहे. इथं तब्बल 206 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफूटीत पाच लोक बेपत्ता झाले आहे. त्याच बरोबर 150 जनावरं वाहून गेली आहेत. अनेक गावामध्ये लोकं अडकून पडले आहेत. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी बचाव कार्यही सुरू केले आहे. मात्र तिथली परिस्थिती पाहाता सैन्याला ही पाचारण करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. रावणगावला सर्वात जास्त फटका बसला आहे. या गावात अडकलेल्या 226 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या शिवाय अन्य शेजारच्या 4 गावातून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या ढगफुटीमुळे जवळपास 800 गावं बाधीत झाली आहे. तर 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तातडीनची मदत देण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांना निधी ही उपलब्ध करून देण्यात आल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 पासून ते 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 पर्यंत 3.5 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. या काळात समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली असेल आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्व मच्छिमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या जोडीलाच समुद्रातही मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:30 पासून ते 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 पर्यंत 3.5 ते 4.3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सततच्या पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके आणि मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनांची नोंद झाली असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोसळधार पावसामुळे मुंबईकरांचा वेग मंदावलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (18 ऑगस्ट) मुंबई आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट (Mumbai Rain Red Alert) जारी केला. यानंतर महानगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडला असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी तब्बल पाचव्यांदा पात्राबाहेर गेली आहे. तर राधानगरीसह इतर प्रमुख धरणांमधून सुरु असलेल्या प्रचंड विसर्गामुळे नदीपातळीत आणखी वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत आणि २१ ऑगस्टपर्यंत आणखी जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या अलर्ट जारी करण्यात आले आहेत. सरकारने आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा केली.' मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या कंट्रोल रुममधून पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागाने मुंबईत रविवारी आणि सोमवारी अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सूचित केले होते. ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार आता मुंबईमध्ये पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतील कुर्ला उपनगरात टिळक नगर आणि चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहनचालकांना यातून मार्ग काढताना नाकी नऊ आले आहेत. यातच सायनच्या किंग्स सर्कल भागातही दरवेळीप्रमाणेच पाणी साचल्याने शाळेच्या मुलांची बस पाण्यात अडकून पडली. माटुंगा पोलीस आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.