नागपूर जिल्ह्यात रात्रभर सरासरी 140 मिलिमीटर मुसळधार पाऊस ; शहरात तब्बल 150 मीमी पावसाची नोंद, यंत्रणा कोलमडली ! नागरिक भयभीत !!
xtreme2day
09-07-2025 17:22:41
28965485
नागपूर जिल्ह्यात रात्रभर सरासरी 140 मिलिमीटर मुसळधार पाऊस ; शहरात तब्बल 150 मीमी पावसाची नोंद, यंत्रणा कोलमडली ! नागरिक भयभीत !!
नागपूर (विशेष प्रतिनिधी) - राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यात एका रात्रीत सरासरी 140 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर काल(8 जुलैला) रात्रभरात नागपूर (Nagpur) शहरात तब्बल 150 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. जिल्ह्यात 30 ते 40 लोकांना रेस्क्यू केले असून सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहे. गरज भासल्यास NDRF आणि आर्मीचीही मदत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र सध्या परिस्थिती तशी नसून पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. पूर बघायला जाऊ नये, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात 23 ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने ते मार्ग बंद करावे लागले आहे. कळमेश्वरमध्ये एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. हवामान विभाग आजसाठी रेड अलर्ट दिला आहे. उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज संध्याकाळपर्यंत आल्यानंतर शाळा, महाविद्यालय यांना उद्यासाठीपण सुट्टी द्यावी का? याचा निर्णय संध्याकाळी उशिरापर्यंत घेतला जाईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर हे देखील ग्राऊंड झिरोवर उतरले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पांढूरणा गावात पोहोचले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडून ठिकठिकाणी पुर परिस्थितीची पाहणी केली जात आहे. तर प्रशासन देखील अलर्टवर आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
नागपूरचा प्रमुख मार्ग मानल्या जाणाऱ्या रिंग रोडवरील पडोळे चौकपासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागली आहे. पडोळे चौक ते राधे मंगलम कार्यालय दरम्यान रिंग रोडची एक बाजू पूर्णपणे जलमय झाली असून त्या बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणी साचण्याची समस्या कायम असून वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिकेकडून परिणामकारक उपाय योजले जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप हाऊस आज सुरू आहे की नाही, यासंदर्भात नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.
नागपूर शहरात बेसा भागात अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. मात्र काही नागरिकांनी घरात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी पावसाचा जोर वाढताच रातोरात दाराच्या उंबरठ्यावर तात्पुरती दोन फूट उंचीचे काँक्रीटची सुरक्षा भीत बांधली. त्याचा सकारात्मक फायदा देखील झालाय. नागरिकांना आपल्या घरात पाणी शिरण्यापासून बचाव करता आला. पावसाळा संपला कि दाराच्या उंबरठयावरची भिंत काढून टाकणार असल्याचे खडतकर कुटुंबियांनी सांगितले. स्कुल ऑफ स्कॉलर हि शाळा पुराच्या पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे बाजूने वाहणारा नाला हा थेट शाळेच्या मैदानातून मार्ग काढत शाळेच्या मुख्य दारातून बाहेर वाहत आहे. सुदैवाने पावसाचा धोका लक्षात घेता आधीच जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आजच्या पावसात हि शाळा पाण्याखाली गेली अशून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.