माजी आमदार बच्चू कडूंची सातबारा कोरा निर्धार यात्रा ; आजपासून पुढील आठ दिवस पायी १३८ किमी सुरुवात
xtreme2day
07-07-2025 20:34:12
7765604
माजी आमदार बच्चू कडूंची सातबारा कोरा निर्धार यात्रा ; आजपासून पुढील आठ दिवस पायी १३८ किमी सुरुवात
अमरावती (विशेष प्रतिनिधी) - गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. तसेच राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला आहे. सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्र व्हा, मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक व्हा असे आवाहन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या पापळ गावापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. सात दिवसाची ही यात्रा असणार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.
दरम्यान, अधिवेशनामध्ये डझनभर मंत्राच्या बैठका पार पडल्या मात्र कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही. शासन निर्णय निघाला नसल्याने पदयात्रा काढत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आंदोलनाची धग कायम राहावी, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही पदयात्रा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सुमारे १३८ किमीचे पायी अंतर पार करीत उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.