xtreme2day 06-05-2024 20:01:52 749085
महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार अमरावती (प्रतिनिधी) - पंजाबमधील जालंधर-पठाणकोट महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात अमरावती येथील चार भाविक ठार झाल्याचे वृत्त आहे. यात ११ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. जम्मूजवळील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेऊन हे कुटुंब परतत होते. परतीच्या मार्गावर पंजाबमधील जालंधर जिल्ह्याच रायपूर-रोसूलपूर गावात पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना पंजाब पोलिस दलाचे अधिकारी केवल सिंह म्हणाले, ‘ह्युंदाई आय १० या कारने हे सर्व भाविक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती समोरून येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारला जाऊन धडकली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. कारची धडक एवढी जोरदार होती की धडकेत कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली.’ मृतांमध्ये गानू राम लाल (वय ५९), त्यांचा मुलगा लोकेश्वर (वय ३३), त्यांची पत्नी अनीषा (वय २६) आणि त्यांची ११ महिन्यांची मुलगी निहारिका यांचा समावेश आहे. स्थानिक रहिवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु यातील चौघांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातात इनोव्हा कारमध्ये प्रवास करणारे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.